अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन काठमांडू नेपाळ
अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन काठमांडू येथे दिनांक १२ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२३ रोजी दिमाखात संपन्न झाले. या विश्व साहित्य संमेलनाच्या मुख्य समन्वयकाची जबाबदारी माझ्यावर होती. आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या बैठकीत आवर्जून हा ठराव मांडून सर्व सभासदांना या बाबत कळविले आणि अनेकजण सहभागीही झाले. नेपाळ ट्रीप मध्ये पर्यटनाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आली ते ‘माय सॅक्रीड ट्रीप’ चे मा. जयेश भांगडिया सर यांच्याशी संवाद साधून सर्व सभासदांना या ट्रीपची योग्य ती माहिती देण्यात आली.

स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली संस्थेच्या अध्यक्षा कल्पना गवरे, उपाध्यक्ष गझलकार रवींद्र सोनवणे यांच्याशी कार्यक्रम नियोजनाबाबत अनेक ऑनलाईन बैठका आम्ही घेतल्या व साहित्य संमेलनातील उद्घाटन, स्वागत, स्वागतगीत, व्यासपीठ नियोजन, बॅनर, अतिथि सन्मान, प्रमाणपत्र, मानचिन्ह, आमंत्रणपत्र, निवडपत्र, कवी संमेलन, गझल संमेलन, परिसंवाद, व्याख्यान नियोजन, समारोप इत्यादि सर्व नियोजनाबाबत अनेक वेळा चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप दिले. जाण्याच्या तयारीबाबत पुण्यामध्ये ‘माय सॅक्रीड ट्रीप’ च्या वतीने स्नेह मेळाव्याचे व भोजणाचे आयोजन करण्यात आले यामध्ये पुन्हा सर्वांना पर्यटन व सर्व नियोजन सांगण्यात आले. आमच्या सर्वांच्या मागणीप्रमाणे ‘माय सॅक्रीड ट्रीप’ संस्थेने सर्वांसाठी अक्षरविश्व संमेलन नाव कोरलेले संमेलन जॅकेट सर्वांना वाटप करण्यात आले. पुढील तयारीबाबत मी सर्वांना अवगत केले व सर्वांना नेपाळ संमेलनामध्ये सहभागाबाबत शुभेछा देऊन सर्वांचे आभार मानले
काठमांडू येथील सबरिना हॉटेल परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष 'बकुळग्रंथ' कार कवी राजन लाखे, मुख्य अतिथी शिक्षण सहसंचालक एम. के. गोंधळी, एसएससी बोर्डाचे माजी सचिव अनिल गुंजाळ, स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली संस्थेच्या अध्यक्षा कल्पना गवरे, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर आगरकर, अमेरिकावरून (फिलाडेल्फिया) आलेले डॉ. कलिंद बक्षी, डॉ. किन्नरी कलिंद बक्षी हे दांपत्य तसेच गोवा, पुणे, ठाणे, मुंबई, अकलूज, सातारा येथून आलेले अनेक साहित्यिक व रसिक सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीत ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, गुरुचरित्र अशा धार्मिक ग्रंथांव्यतिरिक्त दिंडीचे खास आकर्षण म्हणजे दिंडीत पशुपक्षी संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनासंबंधित विविध पपेटस् बाहुल्या व मुखवटे हातात घेऊन शिक्षण व पर्यावरणासंबंधित विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात आला.
संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शोभा धामस्कर यांच्या कथ्थक नृत्याने तसेच वाडेकर यांनी गायलेल्या ईशस्तवनाने साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली. सुरवातीला 'कल्पनेचा फुलोरा', 'टण टणा टण', 'मन की बाते', 'जाणिवांची आवर्तने,' 'हसत खेळत गणित' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख अतिथी एम. के. गोंधळी यांचे 'मराठी भाषेची अस्मिता जागवताना' या विषयावर व्याख्यान झाले. संमेलनाध्यक्ष राजन लाखे यांनी आपल्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणात साहित्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत मराठी भाषा अभिजात असूनही अजूनपर्यंत त्यावर सरकारचा शिक्कामोर्तब नसल्याने खंत व्यक्त केली आणि मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
दुसऱ्या सत्रात 'मराठी भाषेवर होणारे प्रसार माध्यमांचे परिणाम' या विषयावर अनिल गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये डॉ. रासगे, प्रामकाशीर, रवींद्र सोनवणे, नंदकुमार पवार यांनी सहभाग घेतला. तिसऱ्या सत्रात अनिल गुंजाळ यांनी राजन लाखे यांची ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्यावर लिहिलेल्या 'बकुळगंध' या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल बकुळगंध फुलताना या शीर्षकाखाली मुलाखत घेतली. चौथ्या सत्रात 'कथासुगंध' या कार्यक्रमात सुधाकर आगरकर, किरण लाखे व एम. के. गोंधळी यांनी कथा सादर केल्या. पाचव्या सत्रात गझलकार बबन धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. संमेलनात सहभागी झालेल्या सर्व महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र तसेच परदेशांतील साहित्यिकांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नेपाळ येथे भारतीय दूतावासातील डॉ. आसावरी बापट संमेलनास उपस्थित होत्या. डॉ. उषा पवार यांनी सूत्रसंचालन केले. देश-विदेशांत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याचे उद्दिष्ट साध्य करत अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलनाचा मराठी झेंडा नेपाळ येथे फडकला हे विशेष !
या संमेलनाबाबत समन्वयक म्हणून मी सर्व नियोजनात सहभाग घेतला परंतु घरातील जवळच्या व्यक्तीच्या तब्बेतीच्या गंभीर कारणास्तव मी वा माझी पत्नी सहभागी होऊ शकलो नाही परंतु सहभागी सर्व सदस्यांच्या सोबत नेपाळमध्ये असल्याचे सतत जाणवत राहिले त्यामुळे त्यांच्या नजरेतून व आमच्या सहकाऱ्यातून नेपाळ अक्षरविश्व साहित्य संमेलन आम्ही अनुभवू शकलो. ‘ याचसाठी केला होता अट्टाहास , संमेलनाचा दिस गोड व्हावा..! ’
-डॉ संजय वसंत जगताप
समन्वयक, अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन नेपाळ
सहसंपादक,अपेक्षा मासिक पुणे
0 टिप्पण्या